लपलेल्या उद्योजकाचा संततशोध

ॲग्रोवन साप्ताहिकासाठीचा ‘कर्ता शेतकरी’ या साप्ताहिक मालिकेतील हा अखेरचा लेखांक..

रामकृष्णहरी वाचकहो! म्हणता म्हणता दहा-अकरा महिन्यांचा काळ सरला आणि ‘ॲग्रोवन’च्या अंकातील आपली ‘कर्ता शेतकरी’ ही लेखमालिका आता संपन्न होत आहे. सह्याद्री फार्मस् आणि इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ ह्या दोन्ही सहभागी संस्थांना ह्या प्रकल्पाच्या रूपाने एकत्र  येता आले आणि त्यातून तयार झाला एक दृकश्राव्य अभ्यासक्रम. उण्यापुऱ्या बेचाळीस भागांचा. आपल्या ‘आवाहन आयपीएच्’ ह्या युट्यूब वाहिनीवर तसेच एबीपी माझा ऑनलाईन आणि सह्याद्री फार्मच्या चॅनेलवर ही मालिका आपल्यासाठी निरंतर उपलब्ध आहेच. 

तरीही लेखरूपाने हा सारा दस्तावेज ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून आम्हाला मांडावासा वाटला त्याची काही कारणे आहेत. कोणताही अभ्यासक्रम म्हटला की त्याचे एक पाठ्यपुस्तक असते. समजा, एका प्रेक्षकाने प्रथम ‘कर्ता शेतकरी’चे एपिसोड पाहिले आणि नंतर उजळणीसाठी लेखांचा वापरतो करेल. काही जण लेखमालिका वाचतील. आणि नंतर स्क्रीनवरचे भाग पाहतील. म्हणूनच ह्या लेखमालिकेवर काही संस्कार करून त्याचे पुस्तक बनवावे असे मनात आहे. प्रकाशकबंधुनी रस दाखवला तर हे पाऊल उचलता येईल. अशाप्रकारे प्रेक्षकश्रोते आणि वाचक अशा दोन गटांपर्यंत तर आपण पोहोचलो. पण अजून एक दस्तावेज ह्या उपक्रमादरम्यान तयार झाला आहे. हे आहे प्रशिक्षण देण्याची पुस्तिका. शेतकरी मित्र-मैत्रिणींच्या गटाला हा ‘स्वाध्यायक्रम’ शिकवावा ह्यासाठी नेमके काय करावे हे उलगडून सांगणारी प्रशिक्षणपुस्तिका सुद्धा तयार झाली आहे. स्वेच्छेने वाचण्या-पाहण्याचा (किंवा पाहण्या-वाचण्याचा) एक फायदा असतोच पण ‘जाणीवपूर्वक’ अभ्यास करण्याची एक पद्धत ह्या ‘ट्रेनिंग मॅन्युअल’ मध्ये आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे कृषीगट, बचत गटातील महिला, कृषीक्षेत्रातले विद्यार्थी-प्राध्यापक आणि कृषीउद्योजक कंपन्या ह्या सर्वांपर्यंत आपला अभ्यासक्रम सशक्तपणे पोहोचू शकेल.

म्हणजे प्रसाराला आवश्यक ती शिदोरी आता तयार आहे. आता प्रचाराची कांस धरणे अत्यावश्यक आहे. तुम्ही म्हणाल, अजूनही प्रसार करायचा तरी कशाला? कारण आपल्याला ‘उद्योजकताके  दो बूंद!’ प्रत्येकापर्यंत पोहोचवायचे आहेत. पोलियोविरोधातले अभियान आरोग्यसेवेने सातत्याने चालवले तेव्हाच त्याचा अपेक्षित परिणाम निर्माण झाला. शेतीबद्दलचा आत्मविश्वास खास करून तरुणांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. डॉक्टरी व्यवसायामध्ये करीयर सुरू करताना अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या एका तरुणाला कुटुंबातील एकाने घरातल्या पिढीजात शेतीव्यवसायात वळण्याचा सल्ला दिला. “माझ्या लाईफस्टाईल साठी असा तोट्याचा व्यवसाय नको” असा सूर त्याने लावला. ह्यातले दोन शब्द महत्वाचे . . . लाईफस्टाईल आणि तोटा.

व्यक्तीच्या जगण्यामध्ये ह्या दोन शब्दांच्या व्याख्या काय असतात त्यावर ‘उद्योजकता’ ठरते. एक तपाहून जास्त काळ लोटला. इंजिनीयर होऊन ‘उत्तम’ नोकरी करणारा आकाश बडवे हा तरुण छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात पोहोचला. शहरी नोकरी मध्ये मन न लागल्यामुळे, केंद्र सरकारच्या एका विकासवृत्तीच्या अंतर्गत दोन वर्षांसाठी तो दंतेवाडा मध्ये पोहोचला. आजही तिथेच कार्यरत आहे. पहिल्याच भेटीमध्ये त्याने भूसूरंग शोधणारी लष्करी  वाहने दंतेवाडाच्या रस्त्यावर पाहिली तेव्हा त्याला ‘अवतार’ चित्रपटातील वाहने आठवली तसेच नक्षलग्रस्त भागातील अडचणींची कल्पनाही आली. ग्रामीण विकासाच्या विविध अंगावर काम करताना हा तरुण रुळला आणि रुजला तो कृषिव्यवसायात. 

आदिवासी, शेतीकडे पाहतात ते फक्त व्यवसाय म्हणून नव्हे तर एक ‘सजीव’ नाते म्हणून. जंगल आणि शेती हे त्यांच्यासाठी एकाच सृष्टीचे अभिन्न भाग. दंतेवाडा हा जिल्हा, ७१% टक्के आदिवासीबहुल पण कुपोषणाचे प्रमाण ५७%. जमीन भरपूर, जंगल दाट पण भूक, कुपोषण, गरिबी आणि बाजारव्यवस्थेचे शोषण ह्या चार समस्या. नेमक्या ह्याच प्रश्नांना उत्तर म्हणून अतिरेकी चळवळी जन्म घेतात. त्यामुळे ह्या प्रश्नांचे योग्य असे उत्तर मिळते का हा पुढचा प्रश्न. पण आठवड्याच्या बाजारामध्ये एक किलो चारोळीच्या बदल्यात एक किलो मीठ घेऊन जाणारी महिला आकाशने पाहिली. 

सहकारी सेंद्रियशेतीचा प्रयोग आकाश आणि सहकाऱ्यांनी सुरू केला. आज या शेतकरी सहकारी कंपनीचे नाव आहे ‘भूमगादी.’ भूमगादी हा स्थानिकांचा बैसाखी किंवा पोंगलसारखा उत्सव. त्याचेच नाव कंपनीसाठी निवडले गेले. आज जिल्ह्यातील १२० गावातील साडेतीन हजार शेतकरी (पुरुष-महिला) ह्या कंपनीचे भागधारक आहेत. ‘आदीम’ हा त्यांचा ब्रँड असून परंपरागत तांदूळ जातींची तीसहून अधिक उत्पादने ते विकतात. त्यांचे एक तांदूळवाण तर काळ्या रंगाचे रोप आहे. अशा अनेक जाती त्यांनी विकसित केल्या. सोबत भात, ज्वारी, बाजरी ह्यांचे प्रोसेसिंग युनिट तयार केले. जंगली पदार्थ उत्तम चवीचे असतात हे सिद्ध करणाऱ्या ‘आदीम कॅफे’ची निर्मिती केली. ह्या कॅफेचे मेनूकार्ड अतिशय प्रेक्षणीय आहे. लाल रंगाचा डोसा त्यात पाहायला मिळतो. (आकाशची मुलाखत संगतवार भागश: उपलब्ध आहे. आवाहन आयपीएच् ह्या  आपल्या यूट्यूब चॅनेलवर)

महत्त्वाचे म्हणजे शेतकरी एकत्र येऊन शेतमालाचा भाव ठरवतात. ह्या जिल्ह्यामधील रासायनिक खतांची खाजगी दुकानेही बंद आहेत. सेंद्रिय शेतीला उत्तेजन द्यायचे तर केमिकल शेतीला बांध घातले पाहिजेत हे तत्त्व शेतकऱ्यांनी २०१५ साली केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर तर २०१८ साली नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडले. ह्या कंपनीने स्वतःची नैसर्गिक खतप्रणाली तयार केली आहे. ‘3G’ हे त्यांचे एक लाडके उत्पादन. जिंजर, गार्लिक, ग्रीन चिली ह्यांची ही प्रमाणित कृमीविरोधक ‘पेस्ट’ आहे. ह्या साऱ्या प्रवासात आकाशला स्वतः मधला उद्योजक मिळाला आहे. उद्योजकता विस्तार पावते आहे. ‘लाईफस्टाईल’ची सही व्याख्या अनेकांना गवसते आहे आणि ‘नफा-तोट्याची’ गणिते आता वैयक्तिक परिघातून सुटून देशव्यापी बनू पाहत आहेत. 

अशीच कहाणी आहे परभणी जवळच्या झरी नावाच्या गावातल्या कृषीभूषण मेघाताई देशमुखांची. माझी ओळख झाली ती परभणीमध्ये दरवर्षी होणाऱ्या ‘वेध’ ह्या आमच्या जीवन शिक्षण परिषदेमुळे. हळूहळू मी सुद्धा तिला ‘आक्का’ म्हणायला लागलो. तिला गवसलेली स्वतः मधली शेतकरी उद्योजक कशी आहे?

आक्काचे माहेर म्हणजे कृषीभूषण कांताभाऊ देशमुखांचे घर. लाडाकोडात वाढलेली, बारावीपर्यंत शिकलेली थोरली लेक गावातल्या गावातच सासरी गेली. शेतकरी कुटुंबातली असूनही ती कधी प्रत्यक्ष शेतीत उतरलेली नव्हती. ऐन विशीमध्ये प्रथम पतीचे निधन, त्यानंतर सासऱ्यांचा मृत्यू असे घाव सोसताना आक्काच्या मनाचा निर्धार होत होता. बहिणाबाई चौधरींची ‘गोंदण’ कविता तिच्या तोंडून ऐकताना अंगावर काटा येतो. पण आक्का ही कविता जगली. प्रथम पारंपारीक शेतीमध्ये उतरली. नंतर वडिलांच्या ‘विद्यापीठा’च्या प्रशिक्षणाखाली पेरू, सीताफळे, लिंबू अशी पिके घेऊ लागली. 

“आमच्यात ‘वर्क फ्रॉम होम’ नसते. सारे जग कोरोनाकाळात घरी बंद होते तरी आम्ही शेतावर होतो.” आक्का सांगत होती. शेतीतले प्रत्येक कौशल्य ती शिकली. “शेतकरी म्हटले की नेहमी ‘तोच’ का येतो तुमच्या नजरेपुढे?’’ आक्काने विचारले. मी तात्काळ आपल्या कर्ता शेतकरी मधल्या ‘अबोलीची बोली’ ह्या दोन भागांचे उदाहरण दिले. तर गेल्या दोन दशकांमध्ये आक्काने साऱ्या शेतीचा पायापालट केला. पाण्याचे नियोजन केले, जमिनीचा कस वाढवला. आज साडेआठ हजारावर झाडांचे फलोद्या  बहरले आहे आणि आक्का आता स्वतःचे, प्रोसेसिंग युनिट सुरू करण्याच्या विचारात आहेत. अर्ध्या अर्ध्या किलोची ‘तगडी’ सीताफळे त्यांनी माझ्या हातात ठेवली. ह्या प्रवासात त्यांनी स्वतःचे बीए आणि एमए पूर्ण केले. मुलाचे शिक्षण करून त्याला पुढच्या प्रवासासाठी परदेशात पाठवले. महिलांना कृषीक्षेत्रात आणण्याची संघटना बांधली. शिवणयंत्रांचे संच आणून महिलांचे केंद्र सुरू केले. ग्रामपंचायतीमध्ये त्या पंच बनल्या. एचआयव्ही ग्रस्त बालकांना दत्तक घेतले आणि दिवसरात्र  काम करताना अक्षरशः घाम गाळून कमावलेली ‘स्मितरेषा’ ढळू दिली नाही. 

आज माझ्या सासरी आणि माहेरी प्रत्येक चांगल्या कामाचा मुहूर्त माझ्या हाताने होतो. पहिले औक्षण माझ्या हाताने होते. हा पाठिंबा नसता तर मी इथवर येऊ शकले नसते.” नम्रपणे आक्का सांगते. आपली दुःखे मनातच ठेवायची आणि तिथेच सोडवायची असतात असे सांगून आक्का म्हणाली, “सुखे मात्र मांडावी जगाच्या बाजारात. त्यांची तशीही किंमत  फारशी नसते घराच्या चौकोनात . . .”

आक्काशी गप्पा मारताना तिच्यातला बहिणाबाईचा वारसा उमगतो. ती सोज्वळ समज मनाला भिडते. (आमच्या तपशीलवार गप्पा लवकरच पहा आवाहन आयपीएच्. वर) आणि आकलन होऊ लागते की आकाश असू दे की आक्का . . .  ह्यांच्यामध्ये उद्योजकता मुळामध्ये होतीच अव्यक्त स्वरूपात. अद्वैत तत्त्वज्ञानात दोन शब्द आहेत. Potential आणि Manifest. बीजामध्ये अव्यक्त स्वरूपात झाड असते. झाड ‘व्यक्त’ होते तेव्हा त्यात फुले-फळे अव्यक्त स्वरूपात असतातच आणि फळ जेव्हा जन्म घेते तेव्हा त्यात लपलेले बीज असतेच.

उद्योजकता ही काही नव्याने तयार करायची ‘वस्तु’ नव्हे. ती गवसण्याची गोष्ट आहे. एकदा गवसली की तिचे मोल कळायला लागते. जगण्याची गणिते बदलायला लागतात. जीवनशैलीची आणि नफ्या तोट्याची सुद्धा.

आक्का म्हणते की, स्त्री स्वतःला भाजून घेते पण इतरांना मायेमध्ये भिजवते. आकाश म्हणतो की त्याला आता दंतेवाड्यात गेल्यावर ‘घरी’ आल्यासारखे वाटते. स्वतःबरोबरच इतर अनेकांच्या जगण्याच्या आकाराला नवे ऊकार देणाऱ्या अशा उद्योजकांच्या कहाण्या ह्या मातीमध्ये रोज घडत आहेत. ही प्रक्रिया देशव्यापी व्हावी म्हणूनचे, ‘सेंद्रिय खत’ म्हणजे ‘कर्ता शेतकरी’ हा अभ्यासक्रम. 

आता उद्योजकतेचा कस वाढवणारे हे साधन समाधानाने आणि विश्वासाने तुमच्या हातात दिलेले आहे. रामराम्!

(ह्या लेखमालेचे शब्दांकन करणाऱ्या माझ्या सहकारी शिल्पा जोशी आणि डॉ. सुवर्णा बोबडे, ॲग्रोवनची संपूर्ण संपादन टीम तसेच सह्याद्री फॉर्म्सचे सर्व सहकारी ह्यांचे आभार. ‘आवाहन आयपीएच्’ हा दृकश्राव्य विभाग आणि ज्याच्या मोलाच्या सहकार्याशिवाय ही मालिका रंगली नसती त्या राजकुमार तांगडेला सलाम. एबीपी माझा वाहिनीच्या टीममुळे ह्या प्रकल्पाला उठाव मिळाला म्हणून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता.)

डॉ. आनंद नाडकर्णी

anandnadkarni@gmail.com

Leave a comment